३१ ऑगस्टच्या महामोर्चासाठी कुरखेड्यात रणनिती; आमदार मसराम यांचे नागरिकांना एकजुटीचे आवाहन.
Oplus_131072
३१ ऑगस्टच्या महामोर्चासाठी कुरखेड्यात रणनिती; आमदार मसराम यांचे नागरिकांना एकजुटीचे आवाहन
कुरखेडा : शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, निराधार आणि महागाईने त्रस्त नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातून भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाच्या नियोजनासाठी कुरखेडा येथील विश्रामगृहात पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीला आमदार रामदासजी मसराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाचे लक्ष सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी व्हावेत, यासाठी गावागावांत जनजागृती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मोर्चाचे नियोजन, नागरिकांची उपस्थिती आणि आयोजनाच्या विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न, आदिवासींचे हक्क, निराधार नागरिकांच्या समस्या तसेच वाढती महागाई या मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महामोर्चा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी आमदार रामदास मसराम म्हणाले की, “अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी ३१ ऑगस्टच्या महामोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
असा असेल महामोर्चाचा मार्ग
दिनांक : ३१ ऑगस्ट २०२६
वेळ : दुपारी १२ वाजता
नेतृत्व : आमदार रामदासजी मसराम
प्रारंभ : आमदार रामदास मसराम यांचे कार्यालय
समारोप : उपविभागीय अधिकारी कार्यालय, वडसा
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, निराधार आणि महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी या महामोर्चात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी एकजुटीची ताकद दाखवावी, असे आवाहन पूर्वतयारी बैठकीत करण्यात आले.
“न्यायाच्या लढ्यासाठी एकत्र येऊया; ३१ ऑगस्टचा महामोर्चा यशस्वी करूया!”
