दिना धरणाचे पाणी शेवटच्या शेतापर्यंत द्या; भेंडाळा परिसरातील धानपीक धोक्यात, सिंचन विभागाच्या नियोजनाविरोधात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन.

0
IMG-20260821-WA0175
Spread the love

IMG 20260821 WA0176

चामोर्शी:-

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना रेगडी नहराचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने धानपिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी उभे धानपीक करपण्याची भीती निर्माण झाली असून, सिंचन विभागाने योग्य नियोजन करून शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.फराडा, रामाळा, मोहुर्ली, वेलतूर तुकूम, सगणापूर, वाघोली, एकोडी, रामसागर व कळमगाव या गावांतील धानपिकांना कन्नमवार जलाशयाचे पाणी मिळते. मात्र, सिंचन विभागाच्या नियोजनाअभावी दरवर्षीप्रमाणे यंदाही या भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काही शेतकऱ्यांची रोवणी पाण्याअभावी रखडली असून, रोवणी झालेल्या शेतातील धानपीकही संकटात आले आहे.रेगडी तलावाचे पाणी सुमारे ३० ते ४० किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन व वाटप करणे आवश्यक आहे. पाणीवाटपावर प्रभावी नियंत्रण नसल्याने नहराच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.दरम्यान, रामाळा येथील शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शेवटच्या शेतापर्यंत तातडीने पाणी पोहोचविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाणी न मिळाल्यास सिंचन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. यावेळी भेंडाळा परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

: धानपिकाची सध्याची अवस्था लक्षात घेता सिंचन विभागाने तातडीने पाण्याचे फेरनियोजन करून नहराच्या शेवटच्या टोकापर्यंत नियमित व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे,काही शेतकऱ्यांचे रोवने रखडले आहॆ तर काहींचे रोवने होऊन पाण्याअभावी करपत जात आहॆ त्यामुळे सुरवातीच्या शेतकऱ्याणा पाण्याची सध्या आवश्यकता नाही आहॆ त्यांचे मायनर बंद करून सलग शेवट पर्यंत पाणी सोडावे.
लचमा शिरगावार आधुनिक शेतकरी
रामाळा

दिना धरणाची दुरुस्ती करावी ::-  जिल्ह्यातील एकमेव मोठे सिंचन प्रकल्प असलेले दिना धरण या धरणाचे बांधकाम 1969 ते 1974 या पाच वर्षात पुर्ण झालेले असून याची सिंचन क्षमता 12 हजार हेक्टर एवढी आहे. या धरणाच्या कालव्याचे जाळे रेगडी ते चामोर्शी तालुक्यातील भेंडाळापर्यंत पसरलेले आहे.
या प्रकल्पाचे कालवे अंदाजे 48 वर्षापुर्वी बांधलेले असल्याने ते जिर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत शेतकर्‍यांना सिचंनासाठी पाण्याचा पुरवठा होत नाही. बर्‍याच ठिकाणी जागोजागी या कालव्याला छिद्र पडल्यामुळे पाणी विनाकारण वाहून जातो. स्थानिक स्तरावरील  यंत्रणेमार्फत धातुर मातुर तात्पुर्ती दुरुस्ती केल्या जाते. मात्र ही दुरुस्ती पहिल्याच पाण्यात वाहून जात असल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्या करीता दिर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेगडी ते टेलरिजलपर्यंत या कालव्याचे सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम करणे आवश्यक आहे. स्थानिक आमदार, खासदार यांचे या बाबीकडे दुर्लक्ष असून आता तरी ते या कामाचे नियोजन करुन पाठपुरावा करावा  शासनानेही याकडे स्वयं प्रेरणेने लक्ष देऊन या कालव्याच्या सिमेंट कॉक्रीट अस्तरीकरणासाठी नियोजन करून जिल्ह्यात सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्याव्या.यावेळी लचमा शिरगावर,अरुण देवतळे, सोमाजी करेवार,धनराज करेवार,रमेश कंकलवार,नितेश फिडीवार व पल्लवी करेवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!