जपतलाई आश्रमशाळेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत; डॉ. देवराव होळी यांच्या मागणीला यश
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दुःखद घटनेत कुटुंबीयांना काहीसा आर्थिक आधार मिळणार आहे.
या प्रकरणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD अनिरुद्ध पालकर यांच्याकडे केली होती.
डॉ. होळी यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. या निर्णयाबद्दल डॉ. होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD अनिरुद्ध पालकर यांचे आभार मानले.
“जपतलाई येथील दुर्दैवी घटनेमुळे आदिवासी समाजावर मोठे दुःख कोसळले आहे. शासनाने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करून संवेदनशीलता दाखविली आहे. मात्र, आर्थिक मदतीसोबतच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,” असे डॉ. देवराव होळी यांनी म्हटले.
दरम्यान, आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना आणि आवश्यक सुरक्षा मानकांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. होळी यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
