मोबाईल कानाला लावून वाहन चालवणे ठरू शकते जीवघेणे; ‘नजर हटी, दुर्घटना घटी’चा विसर नको!
Oplus_131072
सावध रहा सतर्क रहा!
प्रशासनाने वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम राबवावी
वाहतूक नियमांचे पालन, मोबाईलचा वापर टाळणे आणि अपघातांपासून बचाव याबाबत प्रशासनाने विशेष शिबिरे व जनजागृती अभियान राबवून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीविषयी जागरूकता निर्माण करावी.
संपादकीय (गडचिरोली ): प्रवास करताना सुरक्षितता हीच सर्वांत मोठी जबाबदारी आहे. मात्र आजही अनेक दुचाकीस्वार तसेच चारचाकी चालक वाहन चालवताना कानाला मोबाईल लावून सर्रास बोलताना दिसतात. काही सेकंदांचे हे दुर्लक्ष स्वतःच्या तसेच समोरून येणाऱ्या निष्पाप व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ हा संदेश प्रत्येक वाहनचालकाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
मोबाईलवर बोलताना चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होते. समोर अचानक एखादे वाहन, पादचारी, प्राणी किंवा अडथळा आल्यास वाहनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणारा वेळ कमी पडू शकतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा धोका अधिक गंभीर आहे.
आजच्या पिढीमध्ये वेगाची क्रेझ, रेसिंग, ओव्हरस्पीडिंग आणि सोशल मीडियासाठी काहीतरी वेगळे करण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे. काही क्षणांच्या थरारासाठी स्वतःचे आयुष्य धोक्यात घालणे ही शहाणपणाची गोष्ट नाही. अपघात झाल्यानंतर केवळ वाहनचालकाचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.
कॉल आला तर वाहन थांबवा, मगच बोला! वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी वाहन बाजूला लावून कॉल घ्यावा. लांबचा प्रवास करताना दुचाकीस्वारांनी दर्जेदार हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा आणि वेगावर नियंत्रण ठेवावे.
वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून आपला आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. त्यामुळे ‘मला काही होणार नाही’ या मानसिकतेऐवजी ‘मी सुरक्षित पोहोचलो पाहिजे’ हा विचार प्रत्येकाने अंगीकारण्याची गरज आहे.
वेगापेक्षा जीव मौल्यवान, कॉलपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची! नियम पाळा, मोबाईल बाजूला ठेवा आणि सुखरूप घरी पोहोचा.
