चामोर्शीत ‘तान्हा पोळा’ बालगोपालांच्या उत्साहाने बाजार चौकात गजबजला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती.
चामोर्शी, दि. ११ सप्टेंबर २०२६ :
चामोर्शी शहरातील मध्यवर्ती बाजार चौकात पारंपरिक ‘तान्हा पोळा’ उत्सव मोठ्या उत्साहात, मंगलमय आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवात शहरातील बालगोपालांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेत लाकडी नंदीबैल आकर्षक पद्धतीने सजविले. तसेच विविध विषयांवरील देखावे, चित्ररथ (सीन-ॲरी) आणि आकर्षक वेषभूषा साकारत आपल्या कलागुणांचे व सर्जनशीलतेचे दर्शन घडविले.
तान्हा पोळ्याच्या निमित्ताने बाजार चौकात बालगोपालांची मोठी गर्दी झाली होती. सजविलेल्या नंदीबैलांसह विविधरंगी वेशभूषेतील बालचमू सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक संस्कृती आणि बालमनातील सर्जनशीलतेचा सुंदर संगम या उत्सवातून पाहायला मिळाला.
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून बालगोपालांचे कौतुक
या उत्सवाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. त्यांनी तान्हा पोळ्याच्या मैदानावर फिरून बालगोपालांनी सजविलेल्या लाकडी नंदीबैलांची, विविध आकर्षक देखाव्यांची तसेच बालचमूच्या वेशभूषेची पाहणी केली. यावेळी त्यांनी बालगोपालांच्या कलाकौशल्याचे व उत्साहाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “मी दरवर्षी चामोर्शी येथील तान्हा पोळ्याच्या उत्सवाला आवर्जून येत असतो. संपूर्ण शहरातील बालगोपाल एकत्र येऊन ज्या उत्साहाने आणि सर्जनशीलतेने हा पारंपरिक सण साजरा करतात, तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आपल्या संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचे संस्कार अशा उत्सवातून बालपिढीवर होत असतात. या पारंपरिक उत्सवाच्या निमित्ताने चामोर्शीतील सर्व ग्रामस्थ आणि लाडक्या बालगोपालांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रसंगी गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे, बनपुरकर सर, आयोजक समितीचे सामाजिक नेते अमोलजी आईचवार, प्रेमाताई आईचवार, माधवी पेशट्टीवार, रमेश अधिकारी, यशवंत त्रिकांडे, सोयम पेल्लीवार, पंकज पेशट्टीवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला-भगिनी, नागरिक आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाजार चौकात रंगलेल्या या पारंपरिक तान्हा पोळा उत्सवामुळे संपूर्ण चामोर्शी शहरात दिवसभर उत्साहाचे, आनंदाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. बालगोपालांनी सादर केलेले आकर्षक देखावे आणि सजविलेले नंदीबैल हे उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
