गडचिरोलीतील शिक्षणविषयक प्रश्नांवर मसराम यांचा शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा.
Oplus_131072
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या आढावा बैठकीत ग्रामीण-दुर्गम भागातील समस्यांवर सविस्तर चर्चा
गडचिरोली, दि. १० सप्टेंबर : महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न आणि आवश्यक सुविधांचा मुद्दा ठामपणे मांडला.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज आमदार मसराम यांनी अधोरेखित केली. शाळा इमारती, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज, डिजिटल शिक्षणाची साधने, शैक्षणिक साहित्य तसेच शिक्षकांची उपलब्धता यांसारख्या विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
दुर्गम भागातील शाळांच्या सुविधांना प्राधान्य देण्याची मागणी
गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि दुर्गम जिल्ह्यात अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांच्या मूलभूत सुविधांकडे शासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मसराम यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी केवळ शिक्षकांची उपलब्धता नव्हे, तर शाळांमध्ये पोषक शैक्षणिक वातावरण, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाठपुरावा
शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आमदार रामदास मसराम यांनी मांडली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि स्पर्धेच्या युगात त्यांना सक्षमपणे पुढे जाता यावे, यासाठी शिक्षण क्षेत्रातील समस्या शासनस्तरावर मांडून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
दरम्यान, ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच शाळांमध्ये सकारात्मक व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील समस्या ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरजही बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याची शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
