जिल्हा वर्धापन दिनी पत्रकार नितेश गट्टीवार, श्रावण वाकोडे यांचा जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान.
गडचिरोली : जिल्ह्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ‘न्यूज जागर’चे जिल्हा प्रतिनिधी नितेश गट्टीवार आणि ‘वैनगंगा न्यूज 24’चे मुख्य संपादक श्रावण वाकोडे यांना जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजीव गांधी सभागृह, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली – व्हिजन २०४७’ या संकल्पनेवर आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली – व्हिजन २०४७’चे मुख्य प्रवर्तक तथा प्रदेशाध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा महाराष्ट्र राज्य आणि माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते गट्टीवार व वाकोडे यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सामाजिक प्रश्नांना पत्रकारितेतून वाचा
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या, सामाजिक प्रश्न, प्रशासनाशी संबंधित मुद्दे तसेच जिल्ह्यातील विविध घडामोडींना सातत्याने प्रसिद्धी देत जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्यातून समाजातील इतरांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांतील प्रतिनिधी, उद्योजक, महिला उद्योजक, प्रगतिशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिळालेला हा गौरव पत्रकार नितेश गट्टीवार आणि श्रावण वाकोडे यांच्या पत्रकारितेतील कार्याची पावती मानली जात असून, त्यांच्या सन्मानाबद्दल पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
